मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडेला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खातेवाटप अद्याप जाहीर झाले नव्हते. मात्र आज शिंदे फडणवीस सरकारने खाते वाटप जाहीर केले आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवेसेनेला मुख्यमंत्री देऊन राष्ट्रवादीने महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली. तोच पॅटर्न आता देवेंद्र फडणवीस यांनी वापरला आहे. यामध्येही अधोरेखित करण्याची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीच्या चार बड्या नेत्यांची महत्त्वाची खाती त्यांनी आपल्याकडेच ठेवली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार कोसळ्यानंतर तब्बल 39 दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. शिंदे गटातील 9 आणि भाजपच्या 9 आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. त्यामुळे लवकरच खातेवाटप होईल असे सांगण्यात आलं होतं. मात्र खातेवाटप लगेचच जाहीर केले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण विस्तार होऊन चार दिवस उलटले तरी खातेवाटप झालेले नव्हते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आजच्या बैठकीनंतर खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
सरकार बनविण्यात जसं देवेंद्र फडणवीस यांचं मोठं कर्तृत्व राहिलं तसंच खातेवाटप करण्यातही देवेंद्रांचा वरचष्मा राहिल्याचं दिसून येत आहे. कारण आज जाहीर झालेल्या शिंदे सरकारच्या खातेवाटपावर नजर मारल्यास देवेंद्र फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक लक्षात येईल. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवेसेनेला मुख्यमंत्री देऊन राष्ट्रवादीने महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली. तोच पॅटर्न आता देवेंद्र फडणवीस यांनी वापरला आहे. यामध्येही अधोरेखित करण्याची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीच्या चार बड्या नेत्यांची महत्त्वाची खाती त्यांनी आपल्याकडेच ठेवली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं अर्थ, दिलीप वळसे पाटील यांचं गृह, जयंत पाटील यांचं जलसंपदा आणि जितेंद्र आव्हाड यांचं गृहनिर्माण खातं त्यांच्या स्वत:कडेच ठेवलं आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला दुय्यम खाती खाती दिल्याचा आरोप भाजपने वारंवार केला होता. आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात बहुतांश मलईदार खाते भाजपने आपल्याच नेत्यांकडे ठेवली आहे. त्यातही राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची खाती आपल्याकडे ठेवून फडणवीसांनी सूचक संदेश दिला आहे.
पाहा कोणत्या मंत्र्यांकडे कोणते खाते –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
गिरीष महाजन – ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता
दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन
सुरेश खाडे – कामगार
संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय सामंत- उद्योग
तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
अब्दुल सत्तार – कृषी
दीपक केसरकर – शालेय शिक्षण व मराठी भाषा
अतुल सावे – सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज देसाई – राज्य उत्पादन शुल्क
मंगलप्रभात लोढा – पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास