यूएईमध्ये सुरू असल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये सुपर-४ फेरीतील शेवटचा सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने सुरुवातीला फलंदाजी करत श्रीलंकेसमोर १२२ धावांचे आव्हान ठेवले होते. श्रीलंकेच्या पाथुम निसांका, भानुका राजपक्षे तसेच दासून शनाका यांनी संयमी फलंदाजी केली, ज्यामुळे श्रीलंकेला विजयापर्यंत पोहोचता आले. आता ११ सप्टेंबर रोजी याच दोन संघांमध्ये अंतिम लढत होणार आहे.
श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू सुरुवातीला फलंदाजीसाठी मैदानात उतरले. पाकिस्तानचे सलामीवर मोहम्मद रिझवान (१४) आणि बाबर आझम (३०) या जोडीने साधारण कामगिरी केली. फखर जमान (१३) इफ्तिखार अहमद (१३) हेदेखील आपली कमाल दाखवू शकले नाहीत. पुढे मोहम्मद नवाज ( २६) वगळता पाकिस्तानचा एकही खेळाडू पाचपेक्षा जास्त धावा करू शकला नाही. आसिफ अली, हसन अली शून्यावर बाद झाले.