प्रतिनिधी /NHI
मुंबई : नाबाद अर्धशतकवीर जपजीत रंधवाच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीमुळे कल्याण टस्कर्सने सानपाडा स्कॉरपियन्सचा आठ विकेटने मोठा पराभव केला. माझगाव क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये कल्याण टस्कर्सने तिसऱ्या साखळी सामन्यामध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. सलामीवीर वरुण लवांडेने अर्धशतक फटकावूनही सानपाडा स्कॉरपियन्सची पराभव मालिका थोपविता आली नाही. एनएमपीएलचे कमिशनर प्रदीप कासलीवाल यांच्या हस्ते जपजीत रंधवाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी एनएमपीएलचे चेअरमन शाह आलम शेख, अभिजित घोष, भूपेंद्र सिन्हा आदी उपस्थित होते.
दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर कल्याण टस्कर्सने नाणेफेक जिंकून सानपाडा संघाला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर वरुण लवांडे (३६ चेंडूत ५० धावा, ३ षटकार व ३ चौकार) व अनिल रोनाकी (१९ चेंडूत २४ धावा, ४ चौकार) यांनी ६७ धावांची दमदार सलामी देऊनही सानपाडा संघाला २० षटकात ८ बाद १३७ धावसंख्येपर्यंतच मजल गाठता आली. आदित्य धुमाळ (१६ धावांत २ बळी) व अजय मिश्रा (२० धावांत २ बळी) यांनी छान गोलंदाजी केली. प्रत्युत्तरादाखल सलामीवीर जपजीत रंधवा (५६ चेंडूत नाबाद ६९ धावा, ३ षटकार व ४ चौकार) व अष्टपैलू आदित्य धुमाळ (२२ चेंडूत नाबाद ३२ धावा, १ षटकार व ३ चौकार) यांनी चौकार-षटकारांची फटकेबाजी करून तिसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची अभेद्य भागीदारी केली. परिणामी कल्याण टस्कर्सने पराभवाची मालिका खंडित करीत विजयी लक्ष्य १८.२ षटकात २ बाद १४० धावा ठोकून साकारले.
******************************