पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मुंबईत झालेल्या एका भव्य कार्यक्रमात ‘मैं दीनदयाल हूँ’ या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच दीनदयाळ उपाध्याय यांच्या तसबिरीला अन्नू कपूर, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमने पुष्प वाहून श्रध्दांजली अर्पित केली. अन्नू कपूर यांनी यावेळी मुहूर्ताचा क्लॅप दिला.
टीजीएम फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात असून उत्तर प्रदेशमध्ये मे महिन्यापासून चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक पवन केके नागपाल, निर्माते रंजीत शर्मा, सहनिर्माते हरीश रेड्डी नगलमदका, कार्यकारी निर्माते राजीव धमीजा आणि लेखक राशिद इक्बाल यांनी चित्रपटासंदर्भात उपस्थित माध्यमांशी गप्पा मारल्या. ‘ पंडित दीनदयाळ एक राजकारणी नेते म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही खूप मोठे होते. मातृभूमीसाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. अशा खंबीर व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट करणे हे निर्माते, दिग्दर्शक, लेखक सगळ्यांसाठीच मोठे धाडसाचे काम आहे’, अशा शब्दांत अभिनेते अन्नू कपूर यांनी चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले. दीनदयाळ यांच्या या चरित्रपटातून तत्कालिन राजकीय घटनांचे चित्रण आहेच, मात्र त्याबरोबरीने त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता की त्यामागे काही राजनैतिक कट-कारस्थान होते, याबाबतही चित्रपटातून प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, असे सांगत लेखक राशिद इक्बाल यांनी ताकदीने हा विषय चित्रपटातून मांडला असल्याचेही अन्नू कपूर यांनी स्पष्ट केले.
लेखक राशिद इक्बाल यांनी चित्रपटाची कथा मला ऐकवली तेव्हाच यावर चित्रपट केला पाहिजे असे मला वाटले. आणि पटकथा ऐकताच या भूमिकेसाठी पहिल्यांदा माझ्या तोंडून अभिनेता अन्नू कपूर यांचे नाव निघाले. अन्नू कपूर यांच्यासारख्या अनुभवी कलाकाराशिवाय दीनदयाळ यांची व्यक्तिरेखा कोणी साकारू शकत नाही. पोस्टरवरील दीनदयाळ यांच्या रुपातील अन्नू कपूर यांना पाहून ते या भूमिकेत कसे चपखल बसले आहेत हे लक्षात येईल. त्यांनीही ही भूमिका करण्यासाठी कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला हे आमचे सौभाग्य आहे’, असे दिग्दर्शक पवन केके नागपाल यांनी सांगितले. तर जेव्हा आम्ही संघाचे इंद्रेश कुमार यांच्याकडे दीनदयाळ उपाध्याय यांच्यावर चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्यांनी मला हा चित्रपट बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांचा आशिर्वाद मिळाल्यानंतरच आम्ही या चित्रपटाची तयारी सुरू केली, असे निर्माते रंजीत शर्मा यांनी सांगितले. ‘दीनदयाळ यांच्या मृत्यूचे रहस्य आणि त्यांचे आयुष्य यांची सांगड घालत एक अंगावर काटा आणणारा चरित्रपट आम्ही बनवला आहे. अशा चित्रपटासाठी अन्नू कपूर यांच्यासारख्या ताकदीच्या अभिनेत्याची निवड यासारखी आनंदाची गोष्ट नाही. या चित्रपटासाठी निर्माते रंजीत शर्मा, संघाचे सदस्य यांचाही पाठिंबा लाभला आहे. पावणेदोन तासांचा हा चित्रपट तुम्हाला नक्कीच खिळवून ठेवेल’ असा विश्वास चित्रपटाचे लेखक राशिद इक्बाल यांनी व्यक्त केला.