शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदावर केदार दिघे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर नेत्याविना असलेल्या ठाण्यातील शिवसेनेला अखेर नेता मिळाला आहे. तसेच शिवसेनेतील बंडखोर नेत्यांकडून सातत्याने आनंद दिघे यांच्या नावाचा वापर होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी केदार यांची करत मोठी राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचे बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्ता स्थापन केली. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून त्यांना मोठे समर्थन मिळत आहे. जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले. पक्षविरोधी कारवाई केल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना पदावरून हटविले. शिवसेनेच्या गडाची पडझड सुरू असतानाही जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती केली नव्हती. त्यामुळे ठाण्यातील शिवसेना नेत्याविना असल्याचे चित्र होते.
आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे आणि खासदार राजन विचारे हे दोघे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले होते. त्यामुळे जिल्हा प्रमुख पदासाठी आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे आणि खासदार राजन विचारे यांचे नाव आघाडीवर होते. रविवारी ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने केदार दिघे यांच्यावर मोठी जबाबदारी दिली असून त्यांची ठाण्याच्या जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केली आहे.