अकोला : दि. २२ : अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशन मार्फत खरीप हंगामासाठी शेतीवर आधारित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत राज्यातील विविध खेड्या पाड्यातील शेतकरी सहभागी होणार आहे. हे लक्षात घेता आपल्या गावातील शेतकरी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्यास ही स्पर्धा वरदान ठरणार असून या माध्यमातून एकत्रितपणे गावात हरितक्रांती घडवू असा विश्वास करतवाडी रेल्वे - धामना गट ग्राम पंचायत सरपंच शीतल रुपेश पेठे यांनी व्यक्त केला आहे.
पानी फाउंडेशनने गेल्या वर्षी सुरू केलेल्या फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून अनेक शेतकरी एकत्र आले, सुधारित शेती पद्धतीचा वापर केल्यामुळे शेतीला मोठा हातभार देखील लागला, उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनात देखील वाढ झाली, याच पार्श्वूमीवर करतवाडी रेल्वे धामना या गट ग्रामपंचायत अंतर्गत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फार्मर कप स्पर्धेत सहभागी व्हावे, त्यासाठी गावातील शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी गटशेती अंमलात आणावी. येत्या काळात गावातून कृषि उद्योजक तयार व्हावेत. शेतीला व्यवसायाच्या दृष्टीने पाहून नवतरुणांनी शेतीकडे वळावे, गटशेती केली तर त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ नक्कीच होईल अशी आशाही सरपंच शीतल पेठे यांनी व्यक्त केली. याबाबत पाणी फाऊंडेशनचे अकोट तालुका समन्वयक जीवन गावंडे म्हणाले की, “रासायनिक खतामुळे जमिनीची रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली आणि दुसरीकडे राज्यात कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला. म्हणून आपल्याला नैसर्गिक शेतीकडे यावे लागेल. फार्मर कप स्पर्धेचा आधार घेत जास्तीत जास्त विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी या विनामूल्य प्रशिक्षण व स्पर्धेत सहभागी व्हावे. यात सर्वोत्कृष्ट शेतकरी गट राज्यस्तरीय प्रथम १५ लाख, द्वितीय १० लाख , तृतीय ५ लाख रुपये पुरस्कार , तर सर्वोत्कृष्ट महिला शेतकरी गट राज्यस्तरीय ५ लाख , तालुका पातळीवर सर्वोत्कृष्ट शेतकरी गट १ लाख, सर्वाधिक कार्यक्षम शेतकरी गट असलेली ग्रामपंचायत ५ लाख रुपये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी मोफत प्रशिक्षण आणि राहण्याची व्यवस्था पानी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे” अशी माहिती गावंडे यांनी दिली.