मुंबई, ; युनेस्कोने जागतिक वारसा दिन साजरा करण्याची सुरवात केली, तेव्हापासून दरवर्षी 18 एप्रिल रोजी साजरा केला जातो. यावर्षी, आज म्हणजेच, 18 एप्रिल, 2023 रोजी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई मंडळाने जागतिक वारसा दिन, जागतिक वारसा स्थळ असलेल्या घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेण्यांच्या परिसरात साजरा केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले, उरण परिक्षेत्र वन अधिकारी कोकरे यांनी सांगितले की, आपल्या भूतकाळातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन हे आपल्या भविष्यातील उपक्रमांसाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरते.
आपल्या पूर्वजांनी अतिशय समंजसपणे सार्वजनिक वापरासाठी मंदिरे, टाक्या, किल्ले ज्या व्यापक भावनेने बांधले, ते आपण समजून घ्यायला हवे, आणि योग्य प्रकारे या वारशाचा अभिमान आपण बाळगायला हवा. असे, मुंबईच्या पाटकर महाविद्यालयात इतिहासाच्या प्राध्यापिका डॉ. उषा विजयलक्ष्मी, यांनी म्हटले आहे. स्मारके आपल्याला आपला भूतकाळातील सामाजिक सांस्कृतिक इतिहास शिकवतात. असेही त्या म्हणाल्या.
यावेळी घारापुरीच्या सरपंच मीना मुखेश भुई,माजी सरपंच बाळाराम पद्माकर ठाकूर, राजेंद्र हरिचंद्र पडते आणि उरणच्या ज्ञानपीठ महाविद्यालयाचे व्याख्याते डॉ. दत्ता पिलाप्पा हिंगमिरे हे देखील उपस्थित होते.
भारतीय पुरातत्व विभागाच्या मुंबई मंडळाचे सहाय्यक अधीक्षक, पुरातत्वशास्त्रज्ञ, डॉ. ए.व्ही. नागनूर, यांनी यावेळी जागतिक वारसा दिनाचे महत्त्व आणि आपला वारसा जपण्यात तरुणांची भूमिका या विषयावर व्याख्यान दिले. एआयएचसी च्या विभागप्रमुख डॉ. अनिता राणे-कोठारे, आणि सेंट झेवियर्स कॉलेजचे डॉ. क्रिश दलाल, “एलिफंटा लेणी- स्थापत्यशास्त्रातील आश्चर्य” आणि “घारापुरी लेण्यांचा आणि सभोवतालचा इतिहास” या विषयावर व्याख्याने झाली.
त्यानंतरच्या कार्यक्रमांच्या मालिकेत, ‘एलिफंटा लेणी: भूतकाळ आणि वर्तमान’ आणि ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित भारतातील जागतिक वारसा स्मारके’ या संकल्पनेवर आधारित छायाचित्र प्रदर्शनासह शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या.
मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेज, पाटकर कॉलेज आणि उरणच्या कोकण ज्ञानपीठ कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी यावेळी आयोजित चर्चासत्र आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला. विजेत्या आणि सहभागी स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
जागतिक वारसा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश, जागतिक वारसा स्थळे/स्मारकांची विविधता आणि प्रदर्शन आणि त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांबद्दल जनजागृती करणे हा आहे. त्याशिवाय, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्यास यामुळे प्रोत्साहनही मिळते