सलामीवीर साहिल गोडेच्या नाबाद अर्धशतकामुळे ठाणे टायगर्सने कोपरखैरणे टायटन्सचा ७ गडी राखून पराभव केला आणि माझगाव क्रिकेट क्लब आयोजित पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये सलग पाचवा साखळी सामना जिंकून विजयीदौड कायम राखली. साखळी गुणतालिकेत अपराजित ठाणे टायगर्सने १० गुणांसह प्रथम स्थान राखले आहे. कोपरखैरणेचा पराभव टाळण्यासाठी शौर्य देसाईने छान फलंदाजी केली. म्हीत इंटरनॅशनलचे चेअरमन विजू भाटीया यांनी साहिल गोडेला सामनावीर पुरस्काराने गौरविले. याप्रसंगी एनएमपीएलचे चेअरमन शाह आलम शेख, प्रदीप कासलीवाल, अभिजित घोष आदी उपस्थित होते.
दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर ठाणे टायगर्सने नाणेफेक जिंकून कोपरखैरणे टायटन्सला प्रथम फलंदाजी दिली. परीक्षित वालसंगकर (२० धावांत २ बळी), भावीन दर्जी (२२ धावांत २ बळी) आदी ठाण्याच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी केल्यामुळे कोपरखैरणेच्या खेळाडूंना स्वैर फलंदाजी करता आली नाही. शौर्य देसाईच्या (२२ चेंडूत २७ धावा) चौकार-षटकारांच्या प्रमुख फटकेबाजीमुळे कोपरखैरणे संघाला मर्यादित २० षटकात ८ बाद ९९ धावांचा पल्ला गाठता आला. प्रत्युतरादाखल ठाणे टायगर्सची सलामी जोडी दुसऱ्या षटकात अवघ्या ५ धावसंख्येवर सरफराज शेखने (१९ धावांत २ बळी) फोडूनही कोपरखैरणे संघाला लाभ उठविता आला नाही. साहिल गोडेने ८ चौकारांच्या सहाय्याने ६८ चेंडूत नाबाद ५३ धावा फटकावीत ठाणे टायगर्सचे विजयी लक्ष्य १५.३ षटकात ३ बाद १०० धावा असे साकारून दिले.