MLC Election Result : राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजीणी सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. कोकणच्या जागेवर भाजपाचा उमदेवार विजयी झाला आहे तर, नागपूरच्या जागेवर भाजपाला धक्का देत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. याशिवाय अमरावती आणि औरंगाबाद येथील मतमोजणी अद्यापही सुरूच आहे. या निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारपरिषदेत प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज ज्या काही निवडणुकी झाल्या, त्या निवडणुकांमध्ये मला अतिशय आनंद आहे की कोकणची शिक्षक मतदार संघाची जागा ती बऱ्याच कालावधीनंतर भाजपाने जिंकली आहे. तिथे निवडून आलेले आमचे आमदार म्हात्रे यांचं आम्ही स्वागतही केलं आहे आणि त्यांचा सत्कारही केला आहे.”
अमरावतीमध्ये आम्हाला अपेक्षित मतं मिळालेली नाही –
“अमरावतीच्या जागेबाबत अजून मागेपुढे होतय, आतातरी आम्ही दोन हजार मतांनी मागे आहोत आणि मला असं वाटतं की पहिल्या फेरीत, पहिल्या पसंतीमध्ये कोणीच कोटा पूर्ण करत नाही. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मोजणी तिथे होणार आहे. पण तरीही अमरावतीमध्ये आम्हाला अपेक्षित मतं काही मिळालेली नाही. थोडी मतं आम्हाला कमी पडली आहेत, त्यामुळे निश्चित याचा विचार हा पक्ष करेल. विशेषता तिथे बाद ठरलेल्या मतांची जी संख्या आहे, ती फार मोठी आहे आणि विशेषकरून त्यामध्ये आमच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमध्ये बाद मतं जास्त आहेत. याचाही एक विचार आम्हाला करावा लागेल.” अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.
सत्यजित तांबेंचे मनापासून अभिनंदन अन् महाविकास आघाडीला टोला –
“मराठवाड्यातही मोठ्याप्रमाणावर चुरस सुरू आहे. पक्ष अतिशय चांगल्याप्रकारे मराठवाड्याची जागा लढला. याचा मला संतोष आहे. याचसोबत नाशिक जो मतदारसंघ आहे, तिथे मी सत्यजित तांबे यांचं अभिनंदन करेन. की महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन त्यांच्याविरुद्ध त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीने केला. परंतु अपक्ष म्हणून निवडणूक लढवूनही अतिशय भरघोस मतांनी ते निवडून आले. म्हणून त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन मी करतो.” असं म्हणत महाविकास आघाडीला फडणवीसांनी टोलाही लगावला.
याचबरोबर “एकूणच या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये काही गोष्टी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाल्या, तर काही गोष्टी आमच्या अपेक्षेच्या बाहेर झाल्या. त्यामुळे ज्या झाल्या आहेत त्याबाबत आनंद आहे आणि ज्या झाल्या नाहीत, त्या संदर्भात निश्चितच आम्ही चिंतन करू. त्या संदर्भात काय सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ते बघू.” असं शेवटी फडणवीस म्हणाले.