दलित पँथर आता शिंदे गटासोबत युती करणार असल्याचं एका गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दलित पँथर नेमकी कुणाची यावरुन आता पँथरच्या दोन गटांमध्ये दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत.
मुंबईः शिवसेनेतून बंडखोरी करुन वेगळी चूल मांडणाऱ्या शिंदे गटामुळे राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. त्यातच आता राज्यातील वेगवेगळे गट शिंदे गटाकडे जात असल्याने वेगवेगळी मतमतांतरी व्यक्त केली जात आहेत. तर दुसरीकडे वंचित आघाडी आणि ठाकरे गटाची जवळीक वाढत असल्याचेही चित्र दिसून येते आहे. हे चित्र अधिक गडद होत असतानाच दुसरीकडे दलित पँथर आता शिंदे गटासोबत युती करणार असल्याचं एका गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दलित पँथर नेमकी कुणाची यावरुन आता पँथरच्या दोन गटांमध्ये दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत. महाराष्ट्रात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे नवनव्या युती-आघाड्यांचा जन्म होऊ लागला आहे.
त्यापार्श्वभूमीवर आता शिंदे गट आणि दलिथ पँथर या संघटनेत राजकीय मैत्रीची चर्चा सुरु झाल्याने राजकीय आगामी निवडणुकांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
येत्या 25 नोव्हेंबर रोजी कराडमध्ये दलित पँथरच्या राज्यकार्यकारिणीची बैठक होणार आहे. याच बैठकीत दलित पँथरकडून शिंदे गटासोबत युती होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
दलित पँथरशी युती झाली तर शिंदे गट ठाकरे-आंबडेकरांच्या संभाव्य युतीला शह देणार असल्याचंही बोलले जात आहे. मात्र सध्या दलित पँथरची राजकीय ताकद महाराष्ट्रात फारशी नसल्याचेही दिसून येत आहे.
दलित चळवळीतून पुढे आलेल्यांपैकी महाराष्ट्रात राजकीय जनाधार प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला आणि रामदास आठवले यांच्या रिपाइं गटाला आहे.
त्यामध्ये वंचित आघाडीनं दलितांसोबत बहुजन वर्गाला सोबत घेतल्यामुळे अनेक स्थानिक निवडणुकांमध्ये वंचित आघाडी वरचढ ठरल्याचे चित्र आहे. म्हणून दलित पँथरचा शिंदे गटाला किती फायदा होणार आहे हे आता आगामी निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.
कारण दलित पँथरने अनेक वर्षांपासून निवडणुका लढवलेल्या नाहीत, त्याबरोबरच या घडीलाही दलित पँथरमध्येच दोन ते तीन गट अस्तित्वात असल्याने राजकीय भूमिका काय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
कधीकाळी नामदेव ढसाळांनी उभी केलेली दलित पँथर ही शिवसेनेसोबत असायची. मात्र नंतरच्या काळात वैचारिक मतभेदांमुळे दलित पँथर अनेक गट-तटांमध्ये विखुरली गेली.