५० खोके एकदम ओके या घोषणेने झालेली बदनामी… त्यामुळे मतदार संघात अनेकवेळा अनेक नेत्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावं लागलंय
मुंबई : लांबलेला मंत्रिमंडळाचा विस्तार, शिंदे गटातल्या मंत्र्यांना काम करताना येत असलेल्या अडचणी, मंत्र्यांना न मिळणारी मोकळीक आणि त्यातच ‘५० खोके एकदम ओके’ या घोषणेने झालेली बदनामी. अशा एक ना अनेक गोष्टी असतानाच शिंदेंचे १५ आमदार ठाकरेंकडे परतणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यातच रवी राणांच्या खोक्यांवरील आरोपांवरुन बच्चू कडूंनी तर सात ते आठ आमदारांसह वेगळा निर्णय घेऊ असं म्हणत सरकारबाहेर पडण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे शिंदे गटातला भूकंप अटळ आहे का? खरंच १५ आमदार शिंदेंची साथ साथ सोडणार का?कामाख्या देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने गुवाहाटीला जाऊन शिंदे आपल्या मंत्र्यांची आणि नाराज आमदारांची समजूत काढणार असल्याची माहिती आहे.
शिंदे गटातील बहुतांश आमदारांना मंत्रिमंडळात आपला नंबर लागेल, अशी आशा होती. मात्र तीन महिने उलटून गेल्यानंतरही अनेकांना आशेवरच रहावं लागतंय. यात अचलपूरचे आमदार बच्चू कडू, औरंगाबादचे आमदार संजय शिरसाठ, जळगावचे आमदार चिमणआबा पाटील यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ५० खोके एकदम ओके या घोषणेने झालेली बदनामी… पैसे घेऊन बंड केल्याचा मेसेज राज्यातील गावागावात पोहोचलाय. त्यामुळे मतदार संघात अनेकवेळा अनेक नेत्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावं लागलंय.
दोन्ही काँग्रेस ठाकरेंच्या पाठीमागे ठामपणे त्यामुळे शिंदे गटातील आमदार-मंत्र्यांची धाकधूक का वाढलीये?
- सरकार स्थापनेनंतर तीन महिन्यात लागोपाठ ४ प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं प्रकरण
- यासाठी सरकारचे प्रयत्न तोकडे पडले, असा विरोधकांकडून सातत्याने प्रचार, यामुळे सरकारविरोधात राज्यात संतापाची लाट
- पर्यायाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका निवडणुकीत शिंदेंना फटका बसण्याची शक्यता
- शिंदे फडणवीस सरकारमध्ये शिंदे गटातल्या मंत्र्यांची कामे अडतात
- उदा. गिरीश महाजन यांनी शिंदे गटातील मंत्र्यांच्या सुमारे १०० कोटी रुपयांच्या कामांना दिलेली स्थगिती
- शिंदे गटातल्या बहुतांश आमदाराला मंत्री होण्याची इच्छा, पण सद्यस्थिती पाहता इच्छुकांची नाराजी
- जनतेत सरकारबद्दल चुकीची प्रतिमा तयार होतीये, याचीही भीती बंडखोर आमदारांना आहे.
- आदित्य ठाकरे यांच्या सभांना मिळत असलेला प्रतिसाद, उद्धव ठाकरेंबद्दल वाढत चाललेली सहानुभूती
- राष्ट्रवादी आणि काँग्रेस साथ सोडतील, असं शिंदेंना वाटलेलं, पण सध्याच्या परिस्थिती दोन्ही काँग्रेस ठाकरेंच्या पाठीमागे ठामपणे उभा
उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांच्या मतदार संघात तगडे पर्याय शोधलेत. बंडखोरांना घरी बसवण्याचं प्लॅनिंग केलंय. अनेक मतदारसंघात बंडखोरांनी कशी गद्दारी केली आहे हे तेथील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी जनतेच्या मनावर ठसवलंय, त्यामुळे जनतेत मोठा संताप आहे. त्यातच आदित्य ठाकरेंच्या यात्रेला मोठा पाठिंबा मिळतोय आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूतीही मिळतीये. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं टेन्शन दिवेंदिवस वाढतंय.
आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या सगळ्याची खबर लागल्यानंतर ते बंडखोर आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीचं रिसॉर्ट गाठणार आहेत. कामाख्या देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने गुवाहाटीला जाऊन शिंदे आपल्या मंत्र्यांची आणि नाराज आमदारांची समजूत काढणार असल्याची माहिती आहे. येत्या काळातली राजकीय दिशा काय असेल तसेच नाराज आमदार आणि मंत्र्याला काही ना काही आश्वासने देऊन त्यांची मुख्यमंत्री नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतीत, अशी शक्यता आहे.