नाशिक, 2 सप्टेंबर : नाशिकच्या सप्तशृंगी गडावर सध्याच्या घडीला जवळपास पाच लाख भाविक अडकल्याची माहिती समोर येत आहे. भाविकांची गर्दी प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाने आता नव्याने येणाऱ्या भाविकांना नांदुरी गावातच रोखून ठेवलं आहे. खरंतर सध्या नवरात्र सुरु आहे. त्यामुळे सप्तश्रृंगी देवीच्या गडावर भाविकांची गर्दी जमणं हे साहजिकच आहे. पण आज गडावर सगळ्या सुविधांची पूर्तता करुन देखील भाविकांची गर्दी इतकी मोठी झाली की ती नियंत्रणात ठेवणं प्रशासनाच्या आवाक्याबाहेर गेल्याचं चित्र आहे. अर्थात भाविकांची गर्दीच तितकी आहे. पण या गर्दीमुळे अनेक भाविकांना देवीचं दर्शन न घेताच नांदुरी गावातून परतावं लागलं आहे.
राज ठाकरेंच्या दर्शनामुळे 5 लाख भाविक गडावर खोळंबले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सप्तश्रृंगीच्या गडावर जावून देवीचं दर्शन घेतलं. त्यामुळे गडावर आज जास्तच गर्दी जमली. राज यांच्या वणी गडाच्या दौऱ्यामुळे सकाळपासून दर्शनासाठी गेलेल्या अनेक भाविकांना अद्याप दर्शन घेता आलेलं नाही. सप्तश्रृंगी गडावर कल्याणहून काही भाविक देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यांनी आपला अनुभव ‘न्यूज 18 लोकमत’सोबत शेअर केला आहे.
राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमधील आज देवीची सातवी माळ आहे. विशेष म्हणजे आज अनेकांचा सुट्टीचा रविवार सुद्धा आहे. त्यामुळे नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर आज लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. पण आज सगळ्याच भाविकांना सप्तश्रृंगी देवीचं दर्शन मिळालं नाहीय. सप्तश्रृंगी देवीच्या गडावर सध्याच्या घडीला लाखो भाविक अडकल्याची माहिती समोर आली आहे. भाविकांची गर्दी नियंत्रणात येत नसल्याने प्रशासनाने एकतर्फी वाहतूक सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गडावर अडकलेल्या जवळपास पाच लाख भाविकांना खाली आणण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वणी गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गंर्दी संध्याकाळी उशिरापर्यंतदेखील कमी झालेली नाहीय. उलट ही गर्दी वाढतच आहे. याशिवाय गडाच्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यावर आज दिवसभरापासून प्रचंड वाहतूक कोंडी आहे. देवीच्या दर्शनासाठी मुंबई, पुण्यासह खान्देश, विदर्भ अशा राज्यातून वेगवेगळ्या भागातून भाविक गेले आहेत. पण जास्त गर्दीमुळे सर्वांनाच देवीचं दर्शन घेणं कठीण होवून बसलं आहे. त्यामुळे अनेक भाविकांना गडाच्या पायथ्यापासूनच परतीच्या प्रवासाला लागावं लागत आहे. कारण प्रशासनाने वर अडकलेले भाविक खाली येईपर्यंत नव्याने भाविक आणि त्यांच्या वाहनांना जाण्यास बंदी घातली आहे.
कल्याणचे रहिवासी सुरेश पाटील आज आपल्या परिवारासह देवीच्या दर्शनासाठी वणीच्या गडावर गेले होते. या दरम्यान त्यांना कसा अनुभव आला याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आज देवीची सातवी माळ होती म्हणून आम्ही सहपरिवार देवीच्या दर्शनासाठी गडावर गेलो होतो. परंतु आज रविवार आणि त्याच्यात भर म्हणून राज ठाकरे यांचे देवी दर्शन… त्यामुळे सकाळपासून गडावर गेलेल्या लोकांचे अजुनही दर्शन झालेले नाही. आम्हाला खाली सांगण्यात आले की, कलेक्टर साहेबांचा आदेश आहे की, आधी गडावरील भक्त खाली उतरवा तरच खालून वरती भाविकांना पाठवा. मी इतक्या वर्षांतून पहिल्यांदा दर्शन न घेता परत आलोय. आपल्या देशातील आणि राज्यातील व्हीआयपी कलचरने आता देवदर्शनपण दुर्मिळ करायला घेतले असेच म्हणावे लागेल. राजकारणी लोक सर्वसामान्य लोकांचे विचार करोत अशी बुद्धी आई सप्तशृंगी त्यांना देवो”, अशी भावना भाविक सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.