जळगाव: जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना शुक्रवारी रात्री मेहरुन परिसरात गालबोट लावणारी घटना घडली आहे. एका सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जळगाव शहरातील मेहरुन परिसरातील उद्धव ठाकरे समर्थक शिवसैनिक महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर हल्ला केला. कार्यकर्त्यांनी महाजन यांच्या घरावर पेटते सुतळी बॉम्ब आणि दगड फेकले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी रात्रीच चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
मेहरुन परिसरात महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळून एका सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक जात होती. मंडळाचे कार्यकर्ते महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळ आले असता, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात महापौर महाजन यांच्या घरावर गुलाल फेकला. तसेच काही वेळाने दगड आणि पेटते सुतळी बॉम्बसुद्धा फेकले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यांनी महापौरांचे निवासस्थान गाठले आणि घटनेची माहिती घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, गजानन मालपुरे, सरिता कोल्हे, मानसिंग सोनवने यांनी रात्रीच महापौर जयश्री महाजन यांची भेट घेतली.
घटनास्थळी मूर्ती सोडून सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते पसार
घटना घडली त्यावेळी महापौर जयश्री महाजन घरी नव्हत्या. नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झालेले त्यांचे सासरे एकटे घरी होते. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गोण्याच्या गोण्या गुलाल महापौरांच्या घरावर उधळला . यावेळी महाजनांच्या जाऊबाईंनी संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. घरात सासरे आजारी असल्याचेही सांगितलं. मात्र त्याकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले व समजूत घालणाऱ्या महापौरांच्या जाऊबाई यांना मारहाण करत घरावर दगडफेक केली, अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी दिली.
मेहरुण परिसर अतिशय संवेदनशील असतानाही तिथे एकही पोलीस कर्मचारी नव्हता. तसेच घटल्यानंतर घडल्यानंतर या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी आले. त्यांनी पाहणी केली. मात्र त्यानंतरही त्यांनी ही घटना वरिष्ठांना कळवली नसल्याचा आरोपही यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी केला.
जळगाव शहराच्या प्रथम नागरिकांच्या घरावर हल्ला होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? जळगावातील कायदा व सुव्यवस्था संपली असून पोलिसांकडून परिस्थिती हाताळली जात नसेल तर अधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन घरी बसावे, अशी संतप्त प्रतिक्रिया महापौर जयश्री महाजन यांनी या घटनेवर बोलताना दिली आहे.
या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसात ज्या पद्धतीने तक्रार दाखल होईल त्या तक्रारीनुसार सखोल चौकशी करण्यात येईल. या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे यांनी दिली.