शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने संजय राऊतांना 5 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावली
मुंबई – शिवसेना खासदार, प्रवक्ते संजय राऊत यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने संजय राऊतांना 5 सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावली आहे. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायधीश एम. जी. देशपांडे यांनी ही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी सत्र न्यायालयात संजय राऊतांच्या पत्नी, मुलगी आणि बंधू उपस्थित होते.
काय आहे पत्रा चाळ प्रकरण?
– ईडीने पत्राचाळ प्रकरणात २ फेब्रुवारी रोजी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रवीण राऊत यांना अटक केली होती. ते गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. ही हाऊसिंग डेव्हलपमेंट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चरची (एचडीआयएल) उपकंपनी आहे. या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडासोबत करार केला होता. ही चाळ तब्बल ४७ एकरावर वसली असून, तेथे ६२७ भाडेकरू आहेत. या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावी, असा करार सन २०१० मध्ये करण्यात आला होता.त्यानंतर प्रवीण राऊत यांनी एचडीआयएलचे राकेश वाधवान, सारंग वाधवान व अन्य संचालकांना हाताशी घेत या चाळ पुनर्विकासापोटी मिळणाऱ्या चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) परस्पर अन्य बांधकाम विकासकांना विक्री केली. तसंच याद्वारे त्यांनी बेकायदा तब्बल १०७४ कोटी रुपये जमवले. पण, त्याचवेळी पत्राचाळीचा मात्र एक इंचदेखील पुनर्विकास केला नाही. त्याखेरीज याआधारे त्यांनी बँकेतूनही ९५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवले व त्या रकमेचा गैरवापर केला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांनी या घोटाळ्यातील ही रक्कम आपल्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे ट्रान्सफर केल्याचं सांगितलं जातं. तसंच या १०० कोटींपैकी ५५ लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी दिल्याचा आरोप आहे.